Sunday, 2 November 2014

पाच ओळी

वाटतं कधी कधी निघून जावे दूर रानात,
किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात बसावे लपून...
नाहीतर आभाळात उंच उडावे 
तर पक्षांनी म्हणावे,
तुझे कौतुक करावेअसे तू काहीच केले नाहीस...


उगवलेला सूर्यफुललेला ऋतू
उधाणलेला समुद्रघड्याळाचे काटे
काहीतरी सांगू पाहतात आपल्याला
तरीसुद्धा
कळतंय पण वळत नाही हीच गत

वाटते मलाहोऊनी फुलपाखरू
थोड्या कालावकाशात
स्वच्छंद जगावे
सर्वांना सुखी करावे
खूप बागडावे त्यांच्यासवे


मन आरपार सुखावते पावसाच्या येण्याने
खूप काही घडेल म्हणते पावसाच्या येण्याने
आठवणींत बुडू नकोस बाई पावसाच्या येण्याने
यावेळी सुरात गाशील पावसाच्या येण्याने
आयुष्य बहरेल पुन्हा पावसाच्या येण्याने

वाटते मला
होऊनी चांदणी
साथ करावी चंद्राला
शितलता त्याची पांघरून
बेधुंद व्हावे रात्रीला



मनात पिंगा घालणारे शब्द
अलगद उतरावे कागदावर
त्यांना कितीही झाकून ठेवले तरी
सुगंध पसरावा आसमंतात
मोगऱ्याच्या कळ्यांसारखा


निद्राराणीच्या स्वप्नमहाली
मोगऱ्याची कळी हरवून गेली
गालावरती दवबिंदू टपोरा पडता
ती खुदकन हसली,
जणु तिच्या गंधाने ही पहाट झाली...


तू इथे असल्याची हुलकावणी, देतोय प्रत्येक क्षण
डोळ्यांना सतत तूच समोर हवायस
मेंदीच्या रंगसुगंधाने तुझे नाव लिहावे
हाताच्या तळव्यावर
हीच आस सध्या तरी या मुहूर्तावर


मी शोधीत फिरते,
माझी स्वतःची अशी
स्वतंत्र पाऊलवाट
तू सोबत आहेस,
हे गृहित धरून

No comments:

Post a Comment