पावसात भिजलेल्या क्षणांची,
सरींच्या रेशमी धाग्यात मोतीमाळ झाली…
मनाला पुन्हा एकदा सावरताना,
चिंब भिजवून गेल्या आषाढसरी…
असे स्वत:च स्वत:च्या कोशात
हरवून नाही बसायचे
अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट
नेहमी लक्षात ठेवायचे...
खास करून
पहिल्या पावसाच्या आठवणी
खूप काही देऊन जातात…
सुखाचे गाठोडे आपल्यासमोर खुले करतात…
आसवे ओघळतात, आठवणी दाटतात
मनाला गावच्या वेशीवर नेऊन सोडतात,
तिथे दिसते आपले कौलारू घर,
टपटप पडणारी पावसाची सर…
स्वप्नांच्या रानात,
मोहक फुलली पिवळी फुले,
आठवण तुमची येता…
मन हिंदोळ्यावर डुले
माझीच दृष्ट लागेल,
चैतन्यमूर्ती पावसाला…
मनी मोलाचे स्थान,
सख्या पावसाला…
मनाला अलगद झोका दिला
क्षण चाहूल देऊन गेला
चिंब भिजाया आतुर
पाऊस पाहुणा आला…
आज पुन्हा स्वप्नांचा पाठलाग करताना,
मन मोहरून आले…
आता समोर दिसतोय रस्ता,
निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा…
पावसात भिजू नकोस म्हणून,
तुला कसे सांगूॽ
कारण माझेच हात आहेत,
पागोळ्यांखाली…
कधी कधी इतरांच्या सुखातच
आपलं सुख मानायचं असतं
एखाद्या पुष्पबागेपरी
प्रत्येक नातं जपायचं असतं
मनात फुलांची बाग बहरली
दृष्टीपुढे कल्पनेतले विश्व
पण तिथवर नेणारी पायवाट
असंख्य संघर्षांनी युक्त…
पावसाच्या सरींत
भिजताना एकाकी
नुसत्या छत्रीची
सोबत आता नकोशी...
एका आत्ममग्न संध्येला
असेच विचार दाटून आले मनात
आज स्वप्नांचा अंधार असलेली माझी लेखणी
उद्या असेल सत्याचा उजेड...
No comments:
Post a Comment